Sunday 30 May 2021

Shram Nako, Shikshan Pahije


“श्रम नको, शिक्षण पाहिजे”

बालमजुरी विरोधी अभियानामार्फत राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन


    भारतीय राज्यघटनेमध्ये ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली असून, १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रकारच्या धोकादायक व्यवसायामध्ये कामावर ठेवण्यास स्पष्ट प्रतिबंध करण्यात आलेला आहे. बालमजुरी विरोधात कडक कायदेशीर तरतुदी केलेल्या असूनही बालमजुरीचा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही. यासंदर्भात जनजागृती आणि अंमलबजावणीची कमतरता देशभरात सर्वत्र स्पष्टपणे दिसून येते. कोविड-१९ महामारी आणि त्या अनुषंगाने लावण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे बालमजुरी, बालविवाह, आणि शाळाबाह्य मुलांच्या समस्या आणखी गंभीर झालेल्या दिसून येत आहेत.

    बालहक्कांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे राष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क अर्थात बाल मजुरी विरोधी अभियान (CACL) यांच्या दृष्टीने, बाल हक्कांच्या उल्लंघनावर अभिनव उपाययोजनांमधून मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, खाजगी उद्योग क्षेत्र, शिक्षण संस्था, माध्यमे, नागरिक, तसेच मुलांच्या सहभागातून एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.

    जागतिक बालमजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने बालमजुरी विरोधी अभियानाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे शुक्रवार, दिनांक २८ मे २०२१ रोजी एका राज्यस्तरीय ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परभणी, नाशिक, पुणे, मुंबई, अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निरनिराळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांनी या परिसंवादामध्ये सहभागी होऊन, आपल्या समस्या मांडल्या आणि बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. सहभागी मुला-मुलींपैकी बहुतेकजण यापूर्वी किंवा सध्या शेती, वीटभट्टी, भाजी विक्री, घरकाम, तसेच कचरावेचक, अशा कामांमध्ये गुंतलेले होते किंवा आहेत. या मुलांनी परिसंवादांमध्ये मांडलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे -

१. दारूची दुकाने बंद करावीत, जेणेकरून मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळू शकेल आणि कुटुंबासाठी पैसे कमावण्याची गरज पडणार नाही.
२. बालमजुरीची व्याख्या तसेच धोकादायक आणि अ-धोकादायक व्यवसायांबद्दल अधिक स्पष्टता आणावी. या संकल्पनांमधील अस्पष्टतेमुळे मुलांच्या शोषणास वाव मिळतो.
३. आई-वडील कामासाठी घरापासून दूर असताना मुलांना सुरक्षित वातावरण देणाऱ्या वस्ती पातळीवरील सेंटर्स आणि पाळणाघरांची व्यवस्था करावी. अशी सेंटर्स मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी देखील उपयोगी पडू शकतील.
४. कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना आर्थिक सहाय्य आणि उपजीविकेच्या जास्त संधी उपलब्ध करून द्याव्यात, ज्यामुळे मुलांना काम करण्याऐवजी आपले शिक्षण सुरू ठेवता येईल.
५. स्थानिक पातळीवरील सर्व बाल हक्क यंत्रणा, उदाहरणार्थ, गाव/वस्ती आणि शाळा पातळीवरील बाल पंचायत इत्यादी कार्यान्वित कराव्यात, जेणेकरून मुलांना आपल्या समस्या मांडता येतील व मदत मिळवता येईल.
६. शिक्षणाच्या महत्वाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी; विशेषतः पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे.

    मुलांनी सादर केलेल्या या मागण्यांसोबतच बालमजुरी विरोधी अभियानातर्फे पुढील मागण्यांवर जोर देण्यात आला -

१. सदर अभियानातर्फे सरकारकडे कळकळीची मागणी करण्यात येत आहे की, कामगार कायद्यांची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न ताबडतोब थांबवावेत, कारण यामुळे कामगारांच्या कुटुंबांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्यांची दारिद्र्याकडे घसरण होते, ज्याचा अंतिम परिणाम म्हणजे अशा कुटुंबातील मुले मोठ्या प्रमाणावर बालमजुरीकडे ढकलली जातात.
२. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांची आखणी करताना आपण स्वीकारलेल्या जबाबदारीचे पालन करावे. विशेषतः उद्दिष्ट क्रमांक ८.७ म्हणजेच “अत्यंत वाईट स्वरूपाच्या बालमजुरीस प्रतिबंध आणि निर्मूलन, तसेच २०२५ अखेरपर्यंत सर्व प्रकारच्या बालमजुरीचे उच्चाटन” यादृष्टीने आपल्या प्रयत्नांंची पुन्हा आखणी करून कामास सुरुवात करावी.
३. अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी व्यावसायिक आणि गुंतवणूकदार यांना प्रोत्साहन द्यावे; परंतु प्रतिगामी स्वरूपाच्या आणि देशाला मागे घेऊन जाणाऱ्या स्वस्त मजुरी आणि बालमजुरीस परवानगी देऊ नये.
४. १८ वर्षे वयापर्यंत मोफत आणि सक्तीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करावे.
५. शहरांमधील गरीब कुटुंबांसाठी रोजगार हमी योजनेसारखे पर्याय उपलब्ध करावेत आणि अनौपचारिक असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षिततेमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून अशा कुटुंबांमधील मुलांना औपचारिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून टिकवता येईल.
६. स्थलांतरित कुटुंबांचा माग घेऊन, त्यांच्या मुलांचा शाळा प्रवेश सुकर करावा, जेणेकरून संभाव्य बालमजुरी रोखणे शक्य होईल.

    राज्यभरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, पालक, आणि मुलांनी या ऑनलाईन परिसंवादांमध्ये सहभाग घेतला. बालमजुरी विरोधी अभियानाच्या राज्य संयोजक एलिशिया तौरो यांनी अशा परिसंवादाच्या माध्यमातून मुलांना आपली मते आणि मागण्या मांडण्याची संधी देण्याची गरज व्यक्त केली. मंदार शिंदे यांनी सहभागी मुलांच्या सत्राचे सूत्रसंचालन केले, तर आरोकिया मेरी यांनी मुलांच्या तसेच बालमजुरी विरोधी अभियानाच्या मागण्यांची यादी सादर केली. पूर्व राज्य संयोजक मनिष श्रॉफ यांनी आभार प्रदर्शन केले. या राज्यस्तरीय परिसंवादांमध्ये सादर करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने १० जून २०२१ रोजी आणखी एका राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन बालमजुरी विरोधी अभियानातर्फे करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी, संपर्क:
बालमजुरी विरोधी अभियान (CACL), महाराष्ट्र
9892459833 / 9226104518

 

 


 

No comments:

Post a Comment

Seminar on Rehabilitation of Children in Street Situation in Pune 06.02.2024

शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून रस्त्यावरील परिस्थितीमधील मुलांचे पुनर्वसन शक्य – चर्चासत्रामध्ये कृती कार्यक्रमाची आखणी रस्त्यावर...